कृषी विधेयकाची महाराष्ट्र सरकारने काढलेली अधिसूचना स्थगित

मुंबई : वादग्रस्त कृषी विधेयकाची महाराष्ट्र सरकारने काढलेली अधिसूचना अखेरीस स्थगित करण्यात आली आहे. काँग्रेसने अधिसूचना स्थगित केली नाहीतर कॅबिनेटला अनुपस्थित राहण्याचा इशारा दिला होता. 10 ऑगस्ट रोजी काढलेल्या अधिसूचना स्थगित करण्याबाबत 16 सप्टेंबर रोजी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पणन सचिवांना पत्र देखील लिहिले होते. तरीही स्थगिती देण्यात आली नव्हती.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 27 सप्टेंबरला पणन मंत्र्यांना या अधिसूचनेला स्थगिती देण्याबाबत पणन मंत्र्यांना पत्र लिहिले. तरी त्यावर कारवाई करत नसल्याने काँग्रेसने या अधिसूचनेला स्थगिती न दिल्याने कॅबिनेट बैठकीला अनुपस्थित राहण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज अधिसूचना स्थगित करण्यात आली. या प्रकरणी पुन्हा एकदा प्रशासन आणि सरकार यांच्यातील मतभेद समोर आले.