राष्ट्रीय सुरक्षेची माहिती एका न्यूज अँकरला कशी मिळाली?; अर्णब गोस्वामीप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारला खडा सवाल

सातारा : टीआरपी घोटाळा प्रकरणातील दस्तऐवजातून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या घोटाळ्यातील आरोपी रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यात व्हॉटस्ऍप चॅटद्वारे झालेला संवाद सोशल मीडियावर लीक झाला आहे. या कथित संवादातून अर्णब गोस्वामीला पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकची पूर्वकल्पना असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखाल भाष्य करत या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, तसेच राष्ट्रीय सुरक्षिततेच्यादृष्टीने ही गंभीर बाब असल्याचेही त्यांनी टिव्टरव्दारे नमूद केले आहे. (Prithviraj Chavan)
समाजमाध्यमांमध्ये BARC चे पूर्व प्रमुख पार्थो दास गुप्ता आणि रिपब्लिक चॅनलचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांचे Whats app वरील चॅट व्हायरल झालेले आहेत. हे अत्यंत धक्कादायक आहे. यावरती मत व्यक्त करताना काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हटले आहे की, मुंबई पोलिसांनी शोधून काढलेले अर्णब गोस्वामीचे चॅट अत्यंत गंभीर आहेत. राष्ट्रीय सुरक्षेपासून ते घटनाबदल आणि राजकीय नेमणुकांची माहिती एका न्यूज अँकरला कशी मिळाली?, असा सवाल उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारवर तोफ डागण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने या घटनेची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे, तसेच संसदीय संरक्षण समितीने देखील या सर्व प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी ही त्यांनी टिव्टच्या माध्यमातून केली आहे. (Arnab Goswami)
टीआरपी घोटाळाप्रकरणी क्राईम बँचने 3600 पानांचे पुरवणी आरोपपत्र नुकतेच दाखल केले आहे. त्यातील 500 पाने ही गोस्वामी आणि गुप्ता यांच्यात झालेल्या व्हॉटस्ऍप संवादाची आहेत. सोशल मीडियावर या संवादातील लीक झालेल्या माहितीमधून गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय व केंद्र सरकारमधील काही सदस्यांसोबत जवळीक असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
Whats App चॅटमधून समोर आली धक्कादायक माहिती..
फेब्रुवारी 2019 ते एप्रिल 2019 या काळात गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यात व्हॉटस्ऍप चॅटद्वारे झालेल्या संवादाचे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
• पुलवामात हल्ला होण्यापूर्वी चार दिवस आधीच अर्णब गोस्वामीला कश्मीरमध्ये काहीतरी गडबड होणार असल्याची कल्पना होती.
• 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे प्रत्यक्ष दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी फक्त आपल्याच चॅनलचे लोक घटनास्थळी हजर असल्याचा दावा अर्णब गोस्वामी यांनी केला आहे.
• 23 फेब्रुवारी 2019 रोजी दासगुप्ता यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान काहीतरी मोठं घडणार असल्याचं गोस्वामी सांगितलं होतं.
• 26 फेब्रुवारी 2019 रोजी बालाकोट एअर स्ट्राइक झाला. त्यानंतर दासगुप्ता यांनी एअर स्ट्राइक हीच मोठी घटना ना, अशी विचारणा 27 फेब्रुवारीला व्हॉटस्ऍप चॅट करत केली.
मुंबई पोलिसांनी शोधून काढलेले अर्णब गोस्वामीचे चॅट अत्यंत गंभीर आहे. राष्ट्रीय सुरक्षेपासून ते घटनाबदल आणि राजकीय नेमणुकांची माहिती एका न्यूज अँकरला कशी मिळाली? केंद्र सरकारने या घटनेची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. संसदीय संरक्षण समितीनेदेखील या सर्व प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी.
— Prithviraj Chavan (@prithvrj) January 17, 2021