Chhatrapati Sambhaji Nagar : नामांतर शहराचं की जिल्ह्याचे? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी समजावून सांगितली प्रक्रिया! 

Chhatrapati Sambhaji Nagar : उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) नामकरण करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. पण या नावावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही नावे फक्त शहराची बदलली आहेत, की संपूर्ण जिल्ह्याचं नामकरण होणार आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केले जातायेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील प्रश्न उपस्थित केला आहे. हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणं अपेक्षित असल्याचं दानवेंनी म्हटलंय. तर त्यांच्या या प्रश्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिउत्तर देत, त्यांना प्रक्रिया समजावून सांगितली आहे. 

नेमकं अंबादास दानवे काय म्हणालेत ते पाहुयात

हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा. ता. ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का? हे पण सांगावे. असे ट्वीट विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. दानवेंनी हे ट्वीट करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टॅग केलं आहे. दरम्यान, अंबादास दानवेंच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांनी प्रतिउत्तर दिलं आहे. 

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

अंबादास जी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते. तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे. त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल. तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही असे ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांनी अंबादास दानवेंना नामांतराची प्रक्रिया समजावून सांगितली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मानले पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांचे आभार

दरम्यान,  उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नाकरण करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनीही केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि  उस्मानाबादचे ‘धाराशिव’! असे नामकरण करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आहेत. मी आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे एकनाथ शिदे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

नामांतरावरुन वाद सुरुच, शहराचं नाव बदललं की संपूर्ण जिल्ह्याचं; विरोधकांचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *